प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये ‘नमुमपा’च्या भरारी पथकाकडून २.२० लाख रुपयांची दंडात्मक वसूली
नवी मुंबई, दि. ०७: प्लास्टिकमुळे पर्यावरणाला व मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयातील बैठकांप्रसंगी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांऐवजी काचेच्या किंवा स्टिलच्या बाटल्या वापरण्यास आधीपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. जनजागृतीप्रमाणेच दुकाने व व्यवसायाच्या ठिकाणी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबवून तपासणी करण्यात येत आहे. तपासणीमध्ये प्लास्टिक पिशव्या अथवा एकल वापर प्लास्टिक वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
या अंतर्गत परिमंडळ २ च्या भरारी पथकास से. ११ कोपरखैरणे येथे स्वीट सागर दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्याने रु. ५ हजार दंड वसूली करण्यात येऊन २ किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसी क्षेत्रातील भूषण हॉटेल रबाळे यांच्याकडेही प्लास्टिक पिशव्या आढळल्याने ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. गोठीवली गाव येथील विनायक स्वीट या दुकानातही प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडूनही ५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
तसेच चिंचपाडा येथील गणेश डेअरी यांच्याकडून रु. ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि १ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसी क्षेत्रातील एका दुकानामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडून ५ हजार दंडवसूली आणि २ किलो एकल वापर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे परिमंडळ १ च्या भरारी पथकानेही ५ हजार दंडवसूली केली असून अर्धा किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या ५ दिवसातील या धडक कारवाया असून यामध्ये २५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूली आणि ५.५० किलो इतक्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी मागील फेब्रुवारी महिन्यातही दुकाने/आस्थापनांची तपासणी करताना ४० जणांकडे एकल वापर प्लास्टिक आढळल्याने त्यांच्याकडून २ लाख इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच १२३.१०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तरी प्लास्टिकमुळे होणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हूनच स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व कापडी/कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत व प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
