अवकाळी पावसाने आज पुन्हा महाराष्ट्रातल्या काही भागात लावली हजेरी
गेले तीन-चार दिवस कोकण तसेच पुणे, नाशिक पट्ट्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटात अनेक ठिकाणी पाऊस पडला. दिंडोरी तालुक्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू तर दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. तसेच येवला व मनमाड परिसरातही तुरळक सरींनी हजेरी लावली.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातही सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. या वेळी परिसरातल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. काही काळ विजपुरवठाही बंद झाला होता. मुरबाड व बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.