बीएसएनएलच्या ५४ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार कायमची सुट्टी
नवी दिल्ली: एकेकाळी नावाजलेल्या कंपनीच्या यादीत समावेश असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल
कंपन्या सध्या मोठ्या आर्थिक संकटामुळे डबघाईला आल्या आहेत.
त्यातच बीएसएनएल आपल्या सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांना कायमचे कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय ६० वर्ष असून बीएसएनएलने आर्थिक समस्यांचे कारण देत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयातही दोन वर्षांची कपात करण्यात केली आहे.
बीएसएनएलमध्ये १.७६ लाख कर्मचारी आहेत. तर एमटीएनएलमध्ये २२ हजार कर्मचारी आहेत. येत्या पाच-सहा वर्षात एमटीएनएलमधील १६ हजार आणि बीएसएनएलमधील ५० टक्के कर्मचारी निवृत्त होणार असल्याचं सांगण्यात येतं.
बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील ५० वर्षावरील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार करण्यात आली आहे. हा प्रस्ताव येत्या एक-दोन दिवसांतच केंद्रीय मंत्रिडळाकडे पाठविण्यात येणार आहे.
स्वेच्छा निवृत्ती योजनेमुळे बीएसएनएलमधील एकूण सुमारे ५४ हजार ४५१ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.