अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याला धोका आहे का? जाणून घ्या राज्यात कोणत्या भागात कोसळणार पाऊस
मुंबई, दि. ७: एका बाजूला महाराष्ट्रासह देशात उष्णतेची लाट असताना दुसऱ्या बाजूला आज राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यात यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात पुढील चार दिवस वातावरण ढगाळ राहणार असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, गोंदिया व यवतमाळ या जिल्ह्यांत येलो अलर्ट तर चंद्रपूर व गडचिरोली येथे गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
कोकणातील आंब्याला धोका आहे का?
राज्यात काही विभागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळण्याचा धोका असला तरी कोकणातील शेतकऱ्यांना घाबरण्याचे अद्याप कारण नाही. कोकणातील वातावरण पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ राहणार आहे. सध्या कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हापूस आंब्याची तोड मोठ्या प्रमाणात सुरु झाली असून या आंब्याची राज्यासह देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. अशातच काहीशा ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेले पीक जाते कि काय हि भीती आंबा उत्पादकांच्या मनात होती पण हवामान विभागाने या विभागांत अद्यापतरी अवकाळी पावसाचा कोणताही इशारा न दिल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.