“जसं जनतेला अपेक्षित आहे, असं राज्य असा कारभार आपल्याला करायचा आहे” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे: शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर जाऊन त्या पवित्र भूमीला वंदन केले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, “ही जबाबदारी माझ्यावर आली, ती सुद्धा अनपेक्षितपणे. याचा अर्थ असा की शिवरायांचा आणि जिजाऊंचाच हा आशीर्वाद आहे. हे गोरगरिबांचे, रयतेचे, शेतकऱ्यांचे, माता भगिनींचे राज्य आहे आणि मी अत्यंत नम्रपणे जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन हेच आशीर्वाद मागितले की जसं जनतेला अपेक्षित आहे, असं राज्य असा कारभार आपल्याला करायचा आहे.”
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार एकविरा देवीचे दर्शन घेतले.