आपला देश भागव्याच्या दिशेने न्यायचा का देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांच्या दिशेने : उद्धव ठाकरे
संगमनेर: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपासोबत फक्त भगव्यासाठी युती केली आहे. आमच्या युतीचा भगवा खाली घेण्यासाठी देशात व राज्यात ५६ पक्ष एकत्र आले आहेत. तुमच्या ५६ पिढ्या जरी एकत्र झाल्या तरी भगवा उतरवू शकत नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेरच्या जाहीर सभेत
विरोधकांवर निशाणा साधला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली.
सभेत ठाकरे पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी आपलं आयुष्य भगव्यासाठी वेचलंय मात्र आता देश स्वातंत्र करण्यासाठी लढणारी काँग्रेस आता ती काँग्रेस राहीलेली नाही. राहुल गांधी हे देशद्रोह करणारे कलम रद्द करण्याची भाषा करतात. आमच्याकडे जे अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत तर ते पाकिस्तानसाठीच ठेवले आहेत. हा देश आमचा आहे, असे मानणारा मुसलमान असेल तो सुद्धा माझा भाऊ आहे. आम्ही माढ्यातून पळणाऱ्या शरद पवारांसारखे नाही. देशद्रोह कोणी केला तर त्यास आम्ही फासावर चढविणारे आहोत. आपला देश भागव्याच्या दिशेने न्यायचा का देशद्रोहाचे कलम रद्द करणार्या राहुल गांधींच्या मागे न्यायचा हे तुम्ही ठरवा.
आपल्या देशाच्या सैनिकावर विश्वास नाही ते पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहताहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर ठाकरेंनी केली आहे.
लोकांचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्यच आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करतो असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिर्डी’ हे नाव या मतदारसंघाला मिळाले हे किती भाग्याचे आहे. साईबाबांचे आशीर्वाद ज्यांना मिळतात त्यांचे भाग्य उजळते. येथील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गोरगरीबांना पाणी देण्यासाठी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते उलट फिरविणे का शक्य नाही? जर आपला देश नवनवीन विक्रम करत असेल तर ते शक्य आहे आणि हे काम आम्ही पूर्ण करणारच अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरे यांनी मेहबुबा मुफ्तींवर जोरदार हल्लाबोल केला. अहो बाई, तुम्ही पाकिस्तानात राहता की आमच्या हिंदुस्थानात? पाकिस्तानच्या प्रवक्त्या असल्यासारख्या मेहबुबा मुफ्ती बोलत आहेत. अशा औलादींना आपले सरकार धडा शिकविणारच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.