केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील
मुंबई: ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात बचत गटांची स्थापना करून सर्व गावांमध्ये ग्रामसंघाची बांधणी करण्यात यावी. येणाऱ्या काळात सर्व प्रभागांमध्ये नोंदणीकृत प्रभागसंघ स्थापन केले जावेत, अशा सूचना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विशेष बैठकीत केल्या.
बैठकीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रकल्प संचालक, सिसोदिया, प्रकल्प संचालक गुंजाळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यांतील महिलांना शहरालगत असल्याने दुग्धव्यवसाय करण्याची मोठी संधी आहे, यासाठी अभियानाने नेमके प्रयत्न करून महिलांना मदत करावी, महिलांना भाजीपाला विक्री केंद्र उभे करण्यासाठी मदत करावी. बेकरी उत्पादन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना प्रोत्साहित करावे. या भागातील पारंपरिक व्यवसायांचा शोध घेऊन त्यांना आधुनिकतेची जोड देत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. मेघालयाच्या धर्तीवर ‘बॅक हेड पोल्ट्री’चे प्रयोग ठाणे जिल्ह्यात करावेत, अशाही सूचनाही त्यांनी केल्या.
सूक्ष्म उद्योगांमध्ये ठाणे जिल्ह्यातील महिला पुढे राहिल्या पाहिजेत, यासाठीचे प्रस्ताव तयार करुन केंद्राकडे पाठविल्यास यासंदर्भात स्वतः पाठपुरावा करण्यात येईल. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे राज्यातील इतरही जिल्ह्यातील चांगले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावेत या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी व्यक्तीश: लक्ष घालीन, असेही पाटील यांनी सांगितले. अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी राज्यातील आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अभियानाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. प्रकल्प संचालक सिसोदिया यांनी आभार मानले.