महाराष्ट्रात पारा आणखी वाढला
महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोरडय़ा हवामानात वाढ झाल्याने गेल्या आठवडय़ापासून उष्णतेची लाट प्रसरत आहे. हवामानाच्या कोरडय़ा स्थितीमुळे तापमान कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्याने तेथे अंगाची लाहीलाही होत आहे. मध्य महाराष्ट्रातही उन्हाचे प्रमाण अधिक आहे. तर कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे.
बुलढाणा वगळता विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे कमाल तापमान ४३ अंशांच्या पुढे नोंदविले गेले; त्यामुळे तीव्र उकाड्यामुळे विदर्भकर चांगलेच हैराण झाले आहेत. पुढील २-३ दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. वर्धा ४३.५, नागपूर ४३, अमरावती ४२, यवतमाळ४२.५, चंद्रपूर ४२, अकोला ४२, गोंदिया ४१, बुलढाणा ३८ अंश सेल्सिअस, असा विदर्भात जबरदस्त पारा चढला आहे.
राज्यात अकोला येथे ४३.६ अंश उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद, नांदेड, जळगाव, मालेगाव, सातारा, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, बीड, ब्रद्मपुरी, गोंदिया, आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर पोहोचला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखीन वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.