नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे कॉम्प्लेक्स मधील अनागोंदीला जबाबदार कोणाला धरणार
नवी मुंबई, दि.२४: मागील महिन्यात महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स येथे खुलेआम चालू असलेल्या अनधिकृत धंद्यांबाबत व दारुड्यांच्या सुळसुळाटाबाबत वृत्त प्रसारित केले होते. महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने सिडको प्रशासन व सुरक्षा रक्षक मंडळ चे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. अद्याप या ठिकाणी हे सर्व उद्योग बिनबोभाट चालू असून याच पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात टीम महाराष्ट्र वार्ता ने सुरक्षा रक्षक मंडळ चे ऐरोली ते बेलापूर विभागाचे निरीक्षक ए. बी. लाड यांना संपर्क केला होता. यावेळी त्यांनी चक्क आपल्याला या साऱ्या प्रकाराबाबत व बातमीबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. परंतू या विषयी त्यांना ३० जानेवारी रोजी सविस्तर व्हाट्सअप्प मेसेज द्वारे माहिती देण्यात आली होती व विशेष म्हणजे यात काही प्रश्नही विचारण्यात आले होते. यानंतर ए. बी. लाड यांनी सांगितले की नेरुळ रेल्वे स्टेशन ची जबाबदारी ही वाशी रेल्वे स्टेशन कार्यालयात बसणाऱ्या सावंत नावाच्या अधिकाऱ्यांची असून आपण त्यांनाच संपर्क करावा. यानंतर महाराष्ट्र वार्ता च्या टीम ने ए. बी. लाड यांच्याकडून सावंत यांचा मोबाईल क्रमांक मिळवण्यासाठी दोन वेळा विचारणा केली पण त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही.
अखेर काल सायंकाळी महाराष्ट्र वार्ता चे एक वरिष्ठ प्रतिनिधी सुरक्षा रक्षक मंडळ च्या सानपाडा कार्यालयात थडकले. यावेळी त्यांनी ए. बी. लाड यांना तुमच्या कामातून फ्री होण्यास किती वेळ लागेल असा साधा प्रश्न केला ज्यावर त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी उद्धट वर्तन करत त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगत त्यांना अपमानित केले. या सर्व गोष्टींवरून जाणवते की ए. बी. लाड नावाच्या या निरीक्षकांना आमच्या प्रतिनिधीला टाळायचेच होते.
आमच्या सुत्रांनुसार सुरक्षा रक्षक मंडळ च्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता आहे. नेरुळ रेल्वे स्थानक कॉम्लेक्स येथील सुरक्षा राक्षकासमोरच खुलेआम दारू पिणाऱ्यांची रेलचेल असते. तसेच येथील अनधिकृतरित्या चालणाऱ्या व्यवसायांना या साऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे उघड दिसतेय. याच सोबत सानपाडा रेल्वे स्थानक कॉम्प्लेक्स येथीही असेच अनधिकृत व्यवसायिक व गर्दुल्ले-दारुड्यांचा त्रास सामान्य जनतेला होत असल्याचे आम्हाला कळले. एकूणच या सर्व प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा सुरक्षा रक्षक मंडळ सारख्या उत्तम काम करणाऱ्या संस्थेत अनागोंदी माजेल.