शरद सोनवणे यांनी मनातला भगवा सोडला नाही याला निष्ठा म्हणतात : उद्धव ठाकरे
पुणे: शिरूरच्या जनतेला खासदार आपल्या सोबत राहून काम करणारा पाहिजे की नाटकात काम करणारा खासदार पाहिजेत. शिवाजी महाराज यांचे काम करणारा म्हणून नाही तर शरद पवारांचा उमेदवार म्हणून समोर ये मग आम्ही पाहू? शिरुर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली तोफ डागली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.
मी मत मागायला नाही तर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद मिळाले की मतं मिळतातच. युतीकडे पंतप्रधान या पदासाठी नरेंद्र मोदींसारखे भक्कम उमेदवार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बुडबुडे भरपूर आहेत पण एकही भक्कम चेहरा पंतप्रधान या पदासाठी शिल्लक नाही. असा घणाघाती टोला त्यांनी यावेळी लगावला.
आमची युती ही शेतकऱ्यांसाठी आणि सामान्यमाणसांसाठी झालेली आहे. जाहिरांतींमधून लाज वाटते का? असे आम्हाला विचारणारे यांचा कधी लाजेशी संबंध आला आहे का? जनतेसमोर मतं मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे म्हणत उद्धव यांनी महाआघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
पन्नास वर्षांमध्ये आम्ही ना भगवा बदलला, ना नेता बदलला. आम्ही माझ्या मातेशी आणि मातीशी इमान राखणारा भगवा खांद्यावर घेतला आहे. शरद सोनवणे यांनी मनातला भगवा सोडला नाही याला निष्ठा म्हणतात. आम्हाला आमच्या शिवसैनिकांवर पूर्ण विश्वास आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मनसेतून शिवसेनेत घरवापसी झालेले जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांची स्तुतीदेखील केली.
उद्धव ठाकरे यांनी पन्हाळगडावरील शिवा काशीद यांच्या पराक्रमाचा यावेळी उल्लेख केला. भगव्याची आणि स्वराज्याची निष्ठा काय असते याचा आदर्श म्हणजे शिवा काशीद. मृत्यू समोर असतानादेखील तो डगमगला नाही. माझे मरण हे शिवाजी महाराज बनून भगव्यासाठी बलिदान असेल तर ते माझे भाग्य आहे अशी निष्ठा असणारा शिवा काशीद होता, मात्र दुसरीकडे टीव्ही मालिकेत महाराजांची भूमिका आणि मतदारसंघात शरद पवारांचे काम करणाऱ्याने शिवा काशीद यांच्याकडून निष्ठा काय असते हे शिकले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवाजीरावांच्या सभेला आल्याशिवाय निवडणुकीची खरी गंमत येत नाही. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले की आयपीएल सुरू आहे. चौकार, षटकार मारला पाहिजे आणि तो मारणारच! समोर जमलेली जनता आढळराव यांना अभिमानाने नाही तर सन्मानाने दिल्लीला पाठवणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.