भाजपाच्या आयटी सेलवाल्यांकडून अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेच्या व्हिडिओचा मोदींच्या प्रचारासाठी वापर : राज ठाकरे
पनवेल: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे “लाव रे तो व्हिडीओ” हे वादळ भाजपच्या प्रत्युत्तरानेही थांबायचे नाव घेत नाहीये. काल सायंकाळी कामोठे, पनवेल येथील जाहीरसभेत त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या आयटी सेलचा वादग्रस्त कारभार चव्हाट्यावर आणत मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचार रॅली काढली होती. रॅलीमध्ये मोदींसोबत अमित शहा देखील उपस्थित होते. त्या प्रचार रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपाच्या आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो मोदींच्या प्रचार रॅलीची गर्दी म्हणून दाखवली असल्याचे सांगत, राज ठाकरे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
भाजपला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. यावर भाजपातील नेत्याने का उत्तर दिले नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी केला.
बुधवारी अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय स्वरुपाची अशी मुलाखत होती. राजकारणापलीकडे जाऊन मोदींच्या खासगी आयुष्याविषयी या मुलाखतीतून जाणून घेण्यात आले. राज ठाकरेंनी पनवेलच्या सभेत अक्षय कुमारच्या याच मुलाखतीची खिल्ली उडवली.
अक्षय कुमारने मोदींना किती बालिश स्वरूपाचा प्रश्न विचारला. प्रश्न काय विचारला तर तुम्ही आंबा खाता का? हा काय पंतप्रधानांना विचारायचा प्रश्न आहे. चोखून खाता का? कापून खाता का? काय मस्करी लावली आहे. अक्षयकुमारने विचारलेला प्रश्न विचारायची हिंमत कोणत्याही पत्रकाराला झाली नसती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.