शहीद वीरांच्या कृतज्ञतेपोटी “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत काल सन्मान सोहळ्याचे आयोजन
कल्याण/डोंबिवली, दि. १०: शहीद वीरांच्या कृतज्ञतेपोटी “मेरी माटी मेरा देश” अर्थातच “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत आजच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत आचार्य अत्रे रंगमंदिरात शहीद वीरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हे प्रतिपादन केले.
या उपक्रमांतर्गत महापालिका देशी प्रजातीच्या झाडांची अमृत रोप वाटीका तयार करीत आहे. त्याचप्रमाणे महापालिका प्रांगणातही पंतप्रधान यांचा संदेश आणि शहीद वीरांच्या नावाचा अंतर्भाव असलेला शिलाफलक लावण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा या उपक्रमात महापालिकेने ध्वज विक्री केंद्रही सुरु केले आहे, तसेच बचत गटांच्या माध्यमातून मातीच्या पणत्यांचे विक्री केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
“माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत आज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांचेकडून प्राप्त झालेल्या शहीद वीरांच्या कुंटूंबियांचा तसेच महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील शहीद कर्मचा-यांच्या कुटूंबियांचा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार विजेते गजानन माने यांचे हस्ते स्मृतीचिन्ह, शाल व तुळशीचे रोप देवून सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित असलेल्या सेवानिवृत्त सैनिकांचाही गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी हातात पणती घेवून पंचप्रण शपथ घेतली. तद्नंतर महापालिका शाळांमधील लहान मुलांच्या, वीररसाने प्रेरीत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने आणि महापालिका कर्मचा-यांच्या देशभक्तीपर गीतांच्या श्रवणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सावित्रीबाई फुले कलामंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय लदवा, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी केले.