खासदार छ. संभाजीराजे मातोश्रीवर, “या” तीन मुद्द्यांवर केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरें सोबत चर्चा
मुंबई (प्र. मिथुन): रायगड मधील भ्रष्टाचार, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणचा लढा याबाबत चर्चा करण्यासाठी आज खासदार युवराज संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यानंतर माध्यमांना बैठकीबाबत माहिती देताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “रायगड किल्ला परिसरातील कामांमध्ये कसलाही भ्रष्टाचार चालू देणार नाही आणि कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नाही ही भूमिका घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की राजे, रायगड चे काम हे आपल्याच नेतृत्वात झाले पाहिजे ही केवळ माझीच इच्छा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची मागणी आहे. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धना साठी प्रयत्न करत आहात. तुमची महाराजांच्या किल्ल्यांबद्दल असलेली आत्मीयता आम्ही सर्व जण जाणतो. तुम्ही तिथे आहात म्हणून सर्व काही सुरळीत चालू आहे. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फक्त तुम्ही राजीनामा देऊ नका. यावेळी मी त्यांना आश्वासन दिलं की पूर्वीच्याच जोमाने किंवा त्यापेक्षा जास्त ताकदीने किल्लेसंवर्धन करत राहीन.”
पुढे सारथी संस्थेबाबतच्या विषयावर भाष्य करताना ते म्हणाले की, “यावेळी मी सारथी संस्थेच्या स्वायत्तेसाठी आग्रही मागणी केली. मराठा समाजातील हजारो युवकांना या संस्थेचा थेट लाभ होत आहे. समाजातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्याचे कार्य यामाध्यमातून होणार आहे. आणि त्या संस्थेच्या स्वायत्ततेवर कुणीतरी एक हेकेखोर अधिकारी घाला घालण्याचा प्रयत्न करतो हे ठीक नाही. याबाबत सर्व माहिती मी त्यांना दिली. परिहार साहेबांना कायम ठेवण्याचीही मागणी केली. त्यांनी याबाबतही सकारात्मकता दाखवत तात्काळ निर्णय करण्याचा शब्द दिला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेच याबाबत निर्णय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.”
यावेळी बैठकीत मांडलेल्या तिसऱ्या मुद्द्याबाबत ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात असलेल्या लढ्यात पूर्वीच्याच वकिलांना ठेवण्याची मागणी केली. मी स्वतः प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर असतो. आणि आपली केस व्यवस्थित चालू होती त्यामुळे, वकील तेच ठेवावेत. यावर त्यांनी विश्वास दिला की कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाच्या लढ्यात कमतरता ठेवली जाणार नाही. पूर्वीपेक्षाही जास्त ताकदीने आपण सर्वजण हा लढा लढू असेही त्यांनी सांगितले.”