आरबीआय ला धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी अचानक सादर केला राजीनामा
भारतीय रिझर्व्ह बँकेचे(RBI) डेप्युटी गव्हर्नर ‘विरल आचार्य’ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. विरल आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यासाठी अजून ६ महिने अवकाश होता. आचार्य २३ जानेवारी २०१७ ला आरबीआय चे डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्त झाले होते. या पदावर त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी होता. बिझनेस स्टँडर्ड च्या रिपोर्ट नुसार आचार्य यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला आहे.
डॉ. विरल आचार्य रिझर्व्ह बँकेच्या स्वातंत्र्य व स्वायत्तता बाबत खूप आग्रही होते. त्यांची धारणा होती की असं असणं आर्थिक प्रगती व वित्तीय स्थिरतेसाठी खूपच महत्वपूर्ण आहे. डॉ. विरल आचार्य यांनी २ ऑक्टोबर, २०१८ ला मुंबईत एका भाषणात म्हटलं होतं की, “जी सरकारं केंद्रीय बँकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करत नाहीत, ती कालांतराने वित्तीय बाजारातल्या वाईट परिस्थितीला कारणीभूत ठरतात. तसेच अर्थव्यवस्थेतील मंदीलाही कारणीभूत ठरतात.” काही महिन्यांपूर्वी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर आता विरल आचार्य यांच्या राजीनाम्याला एका वेगळ्याच सुप्त वादाची किनार आहे असे मानले जाते.