वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर आरबीआय ची दूरसंचार विभागासाठी मार्गदर्शक तत्वे निर्गमित
मुंबई, दि. २: देशभरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडक भूमिका घेत आहे. आजकाल बनावट सिमकार्डच्या माध्यमातून सायबर फसवणूक आणि इतर अनेक प्रकारची खोटी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आरबीआय’ने दूरसंचार विभागासाठी (DoT) नवीन मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत. BQ PRIME च्या अहवालानुसार, आरबीआय ने सिमकार्ड संदर्भात KYC शी संबंधित कठोर नियम बनवण्याबद्दल आणि बनावट किंवा सायबर फ्रॉडमध्ये वापरल्या जाणार्या सिमबद्दल डेटाबेस तयार करण्याबद्दल बोलले आहे. एनडीटीव्ही ने याबाबत एक वृत्त प्रसारित केले आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सायबर फ्रॉडच्या आकडेवारीवरून असे समजले आहे की, सिमकार्डच्या माध्यमातून सायबर फसवणुकीच्या प्रकरणात दोन प्रकारची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये फसवणूकीची सर्वाधिक प्रकरणे बनावट सिमद्वारे झाल्याचे आढळून आले आहे, तर अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात सायबर फसवणुकीसाठी फक्त एकच मोबाइल नंबर वापरला गेला होता, परंतु तरीही त्यासंबंधी कोणताही डेटा दूरसंचार विभागाकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे सायबर फसवणुकीत वापरलेल्या सिमकार्डचा क्रमांक ब्लॉक करता आला नाही. त्यामुळे अशा क्रमांकाचा वापर करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना तोंड देण्यासाठी आरबीआयने दूरसंचार विभागाला कडक सूचना दिल्या आहेत. आरबीआयने म्हटले आहे की सिम बदलताना केवायसीची आवश्यकता वाढली पाहिजे. असे केल्याने, या बनावट क्रमांकांद्वारे वन-टाइम पासवर्ड मिळविण्यावर बंदी येईल. त्यामुळे या क्रमांकांशी संबंधित लोकांची बँक खातीही सुरक्षित राहतील.