पंतप्रधान मोदींनी केसाने गळा कापला – मनसे अध्यक्ष राज ठाकरे
नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अर्थात नांदेडमध्ये आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी गेली साडेचार वर्ष मोदींनी जनतेंची फसवणूक केल्याचा आरोपही केला.
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींवर मी प्रचंड विश्वास टाकला होता मात्र त्यांनी केसाने माझा गळा कापला. मोदी आणि शहांबद्दल माझ्या मनात प्रचंड राग आहे. त्या रागातूनच लोकसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचा उमेदवार उभा नसतानाही मी प्रचारात उतरलो आहे, अशा कठोर शब्दांत राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात नेहमी जवाहरलाल नेहरु व गांधी कुटुंबावर टीका करतात, पण मोदींनी जे प्रधानसेवक आणलं ते वाक्यही जवाहरलाल नेहरुचं आहे, तसेच देशाच्या पंतप्रधानांना चुकीचा इतिहास माहित आहे व तेे सर्व जनतेला सुद्धा चुकीचा इतिहास शिकवतात, अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.
जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलतच नाहीत. महिला सुरक्षा, बेरोजगार, शेतकरी आत्महत्यांबद्दल मोदी कधी बोलणार? त्याचप्रमणे शहीद जवानांचे फोटो लावून भाषणे करायला लाजा वाटत नाही का? बीडमध्ये महिलांची गर्भाशयं विकली जात आहेत, चौकीदार करतो काय? असे एकामागून एक संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.