…..तर नरेंद्र मोदी आणि अंबानी तुरुंगात जातील – राहूल गांधी
बेंगळुरू: राफेल कराराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राफेल विमान खरेदीबाबत पंतप्रधान कार्यालयाने फ्रान्स सरकारशी केलेल्या समांतर वाटाघाटींची कागदपत्रे तपासण्यात आली तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचे सर्व सत्य जगासमोर येईल आणि त्यांना तुरुंगात जावे लागले, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
कर्नाटकमधील प्रचारसभेत बोलताना राहुल यांनी हा दावा केला. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषी नसतील, तर त्यांनी राफेल प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले पाहिजेत.
मोदींनी स्वत: समांतर वाटाघाटी केल्या आणि हे सरकार एका विमानासाठी १६०० कोटी रुपये खर्च करण्यास तयार झाले, त्या विमानाची खरी किंमत
५२६ कोटी रुपये आहे असा दावा राहुल यांनी केला. चोरी पकडली जाईपर्यंत मोदी हे एकटेच चौकीदार होते. आता चोरी पकडल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशाला चौकीदार बनवले आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे.