भविष्यात कोणताही वन्यप्राणी आढळून आल्यास त्यापरिसरात तातडीने संचारबंदी लागू करण्याची वन विभागाची मागणी
पुणे: पुण्यासारख्या शहरात भविष्यात कोणताही वन्यप्राणी आढळून आल्यास त्याच्याभोवती होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे तो बिथरून जाऊ नये यासाठी त्यापरिसरात तातडीने संचारबंदी सारख्या उपाय योजना राबवून गर्दीवर नियंत्रण ठेवले जावे अशी मागणी वन विभागातर्फे पोलीस आयुक्तांकडे केली जाणार आहे.
उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पुण्यातील रान गव्याच्या मृत्यू प्रकरणाचा संदर्भ देऊन ही मागणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
पुण्यात बुधवारी आढळून आलेल्या रानगव्याच्या नाकाला जखम झालेली होती आणि त्यातच सैरावैरा धावल्याने त्याची दमछाक झाली आणि पुरेसा श्वास न मिळाल्याने श्वसन यंत्रणेवर ताण येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल वन विभागाने जाहीर केला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाप्रशासनाने एखादा प्राणी शहरात घुसला तर त्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी तातडिने संचारबंदी लावण्यात येईल, असा निर्णय कालच घेतला आहे. संचार बंदीचे उल्लघंन करुन गर्दी केल्यास दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.