पत्रकार परिषद मोदींची, उत्तरं अमित शहांची त्यावर टीका राज ठाकरे व राहुल गांधींची
नवी दिल्ली/ मुंबई: गेल्या ५ वर्षापासून देशभरातील समस्त पत्रकार मंडळी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस काल उजाडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा दुर्मिळ योग्य काल जुळून आला होता. सर्व पत्रकार आनंदात होते की मोदींना थेट प्रश्न विचारता येतील. पण नेमका सर्वांचा पाचका झाला कारण या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहाच सर्वांना सामोरे जात होते. पंतप्रधान फक्त शेजारी बसून श्रोत्याच्या भूमिकेत होते. याच पत्रकार परिषदेचा धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटर च्या माध्यमातून टीका केली आहे. “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…. ‘मौन की बात’! असे ट्विट करत त्यांनी मोदींच्या कालच्या मौनाबाबत टिप्पणी केली आहे.
पाच वर्षात पीएम मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्यामुळे सुरुवातीलाच पत्रकारांनी मोदींच्या दिशेने प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरूवात केली. पण गम्मत अशी, की उत्तर अमित शहा देत होते. मोदींनी एका पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर दिलं की, “अध्यक्ष उत्तरं देतील”.
या पत्रकार परिषदेची राज ठाकरे यांच्या बरोबरीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही खिल्ली उडवली. ते ट्विटर च्या माध्यमातून म्हणाले, “अभिनंदन मोदीजी. उत्कृष्ट पत्रकार परिषद. पुढच्या खेपेस अमित शहा तुम्हाला उत्तर देण्याची संधी देतील ही अपेक्षा.”
काल गंमत अशी होती की त्याच वेळेला राहुल गांधी यांचीही पत्रकार परिषद दुसरीकडे चालू होती.