अखेर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतली दखल
नवी मुंबई : नेरुळगांव व नेरूळ सेक्टर २० परिसरातील गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक/अध्यक्ष तथा नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र (गुरु) म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरुळगांव व नेरूळ सेक्टर २० परिसरात पावसाळी पूर्व कामांअंर्तगत महापालिका प्रशासनातर्फे गटारांची सफाई करताना त्यातील माती व गटारात तुंबलेला कचरा काढण्यात आला. सदर गाळ व कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावणे गरजेचे होते. परंतू तसे झाले नाही. हाच गाळ परत सुकल्यावर धुळीच्या स्वरूपात परिसरात प्रदूषण निर्माण करतो व पावसाळ्यापर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा हा गाळ गटारात जावून नाले तुंबण्याची शक्यता जास्त आहे.
याच पार्श्वभूमीवर नेरुळगांव व नेरूळ सेक्टर २० परिसरातील गटारांची सफाई करावी यासाठी विरेंद्र (गुरु) म्हात्रे यांनी एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाला निवेदनही सादर केले होते. या संदर्भात माहिती देताना म्हात्रे म्हणाले की, “महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना जो गाळ, कचरा बाहेर काढला, त्यालाही आता बरेच दिवस झाले आहेत. गटारातून बाहेर काढलेला गाळ, कचरा आता सुकला असून त्याची दुर्गंधी आता ग्रामस्थांना व रहिवाशांना सहन करावी लागत आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यातच या दुर्गंधी पसरल्याने लोकांमध्ये आजार वाढण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. पुढे पालिकेच्या गलथान कारभारावर बोट ठेवत ते म्हणाले, “ही समस्या दोन दिवसांपूर्वीच पालिका नेरूळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून देऊनही कचरा व मातीचे ढिगारे अजूनही हटविण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरालाही बकालपणा आलेला आहे.”
या संदर्भात अखेर म्हात्रे यांनी लेखी निवेदन देत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बागंर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी अवघ्या काही मिनिटात तक्रारीची दखल घेत संबंधित उपायुक्त यांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश दिले. सध्या कोविड व्यवस्थापनात महापालिकेची यंत्रणा व्यस्त असल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागत आहे.