शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेत शाळा प्रशासनाकडे मागितला खुलासा
नवी मुंबई, दि.१६: नवी मुंबईतील वाशीस्थित आयसीएल(ICL) शाळा व्यवस्थापन कमिटी ने “कोरोना प्रादुर्भावा”चे कारण पुढे करत मराठी माध्यमाच्या सर्व वर्गांचे नवीन प्रवेश बंद कले आहेत. या संदर्भात चिंतातूर पालकांनी वारंवार शाळेच्या व्यवस्थापिका राव यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. RTE कायद्यान्वये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असतांनाही सदर शाळेने शासनाचे आदेश पायदळी तुडवत फक्त आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतुनेच इंग्रजी माध्यमाचे प्रवेश मात्र चालू ठेवले आहेत. याबाबत सर्व पालकांनी शाळेच्या गेटवर दिनांक २ जुलै रोजी आंदोलन केले होते, तरीही शाळेने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही.
शेवटी सर्व पालकांनी लोक अधिकार सेवा समितीच्या माध्यमातून नवी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी स्वाती तिराडकर यांची भेट घेऊन समस्या मांडली असता शिक्षणाधिकारी यांनी तातडीने खुलासा करण्याचे लेखी आदेश दिले तेव्हा शाळेने परस्पर गुपचुपणे शिष्टमंडळाला, पालक प्रतिनिधींना काहीही न कळवता फक्त २० विद्यार्थ्यांना इयत्ता १ली ला प्रवेश दिले. अजुन ४८ विद्यार्थ्यांना इयत्ता १ली ते ९ वी पर्यंत प्रवेश मिळालेले नसून शाळेने काहीच कार्यवाही न केल्याने अखेर आज शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी आयसीएल शाळा पालक संघटनेने लोक अधिकार सेवा समितीचे अध्यक्ष बाळक्रुष्ण खोपडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश मिळावेत म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयावर धरणे आंदोलन केले.
तेव्हा शिक्षणाधिकारी स्वाती तिराडकर यांनी तातडीने सदरच्या आयसीएल शाळेला पत्र पाठवुन पालकांच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या यादीतील ६२ विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत आणि उर्वरीत विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेश देऊन त्या संबधीत लेखी खुलासा पालकांच्या शिष्टमंडळाला आणि नवी मुंबई पालिकेला लवकरात लवकर देण्यात यावा, असे आदेश दिल्याची माहिती दिली. शिष्टमंडळात नरेंद्र वैराळ, अनिल घाणेकर, गोविंद जोशी, दिलीप गजभरे, राजेश वाडकर, सचिन पाटील, राम सोमवारे, अंकिता नवाळे, आदिती मांडवकर, सुजाता तावडे, निर्जला मांगले, विनिता आळीम, श्रेया काप यांनी सहभाग घेतला.