वाहन उद्योग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने महत्वाची असल्याचे नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, दि. ३० : वाहन उद्योग क्षेत्र ई-वाहनांची अधिकाधिक निर्मिती करत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. ते आज महाराष्ट्रात चाकण, पुणे येथील कारखान्यात, भारतात बनलेल्या पहिल्या मर्सिडीज-बेंझ लक्झरी इलेक्ट्रिक कार (580 4Matic) चे उद्घाटन करताना बोलत होते. पर्यायी इंधनाच्या मदतीने वाहन उद्योग क्षेत्राचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले. किफायतशीर, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी पर्याय उपलब्ध करणे हे सरकारचे महत्वाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण पूरक आणि किफायतशीर असल्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत जैव इंधन महत्वाचे असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
ते म्हणाले, आपल्याकडे सक्षम आणि हुशार तसेच संशोधन आणि विकासात योगदान देतील असे सर्वात जास्त तरुण कुशल प्रतिभावान अभियंते आहेत. हे म्हणाले, वाहन उद्योग क्षेत्र जीएसटीच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल मिळवून देते.
वाहन स्क्रॅपिंग (भंगारमध्ये काढणे) धोरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की आपल्याकडे एक कोटी दोन लाख वाहने स्क्रॅपिंगसाठी तयार आहेत, पण त्यासाठी सध्या केवळ ४० स्क्रॅपिंग युनिट्स (सुविधा केंद्र) उपलब्ध आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ४ स्क्रॅपिंग युनिट्स अशी एकूण २००० युनिट्स सुरु करण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले.
गडकरी यांनी पुणे आणि पिंपरी महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या एनएच-48 मधील एनडीए (चांदणी) चौक ते रावेत/किवळे विभागाची पाहणीही केली. वाकड फाटा, भूमकर चौक फाटा, रावेत फाटा या भागातील वाहतुकीशी संबंधित समस्या सोडवणे आणि सुधारणा करणे यावर या पाहणीत विशेष भर देण्यात आला.