योग्य भाव न मिळत असल्याकारणाने काही ठिकाणी शेतकर्यांनी लिलाव रोखला
नाशिक, दि. २४: तीन दिवसांपूर्वी व्यापार्यांनी सुरू केलेलं कांदा लिलाव आंदोलन मागे घेतल्यानंतर आजपासून नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांत लिलाव पूर्ववत सुरू झाले. मात्र पिंपळगाव बसवंत, येवला, लासलगाव कळवण तालुक्यातील नाकोडा बाजार समितींमध्ये कमी भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. लासलगाव बाजार समितीत ५५० ट्रॅक्टरमधून कांदा आवक झाली. सुमारे २ हजार २०० ते अडीच हजार रुपये भाव जाहीर झाल्यानंतरही कमी भाव मिळत असल्याचा आरोप करत लिलाव बंद पाडण्यात आले. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब शिरसागर आणि अन्य संचालक लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कळवण तालुक्यात ए. टी. पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडा आवारात नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा लिलाव व्यापार पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी आहे. कांद्याला २००० ते २१२० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केलं आहे. अद्यापही कांद्याची आवक अपेक्षित प्रमाणात वाढली नसल्याची माहिती कांदा व्यापार्यांनी दिली.