Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नांदुरमध्यमेश्वर आरोग्य उपकेंद्रामुळे गावातच मिळणार उपचार; नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा – पालकमंत्री छगन भुजबळ

नांदुरमध्यमेश्वर येथील आरोग्य उपकेंद्र नवीन इमारतीचे भूमीपूजन सोहळा संपन्न

नाशिक : निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे होणाऱ्या नवीन आरोग्य उपकेंद्रांमुळे गावातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा या उपकेंद्राच्या माध्यमातून मिळणार असून, आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी एकोप्याने गावाचा विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

आज निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथील आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक जयदत्त होळकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, नांदुरमध्यमेश्वरच्या सरपंच उज्वला डांगले, बाळासाहेब पुंड, शांताराम दाते, उप विभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोविडमुळे विकासकामांचा वेग मंदावला होता. परंतु आता कोविड आटोक्यात आहे. त्यामुळे विकासकामांना गती देण्यात येत असून ती टप्याटप्याने तात्काळ पुर्ण करण्यात येतील. तसेच जिल्ह्याला जिल्हा नियोजनाच्या मंजूर निधीतून ६५ टक्के निधी जिल्हा परिषदेला दिला जात असल्याने विकासाची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे. असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

गावातील शेतकऱ्यांनी महावितरणमार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वीजेची देयके भरुन अधिकाधिक सुविधांचा लाभ करुन घ्यावा. तसेच गावातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

यावेळी सुरेखा दराडे, अमृता पवार आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गावातील समस्या मांडल्या व त्या सोडविण्याची मागणी यावेळी त्यांनी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना केली. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम दाते आणि सुत्रसंचालन वसंत पानसरे यांनी केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *