ना. म. जोशी विद्याभवन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा कोरोना काळातील अभिनव उपक्रम !!
प्रत्यक्ष भेटणे सोयीचे नाही असे लक्षांत आल्यानंतर कोणत्यातरी निमित्ताने आणि यथायोग्य माध्यमाद्वारे आपण एकत्र यावे, आपल्या गुरुजनांविषयी भरभरून बोलावे, नव्हे लिहावे, आठवणींना उजाळा द्यावा, सृजनशीलता जपावी, स्नेह वृद्धिंगत व्हावा असे अनेक उद्देश समोर ठेवून ‘माझे सर, माझ्या बाई’ या ई -पुस्तकाची कल्पना वयाची सत्तरी गाठलेल्या, रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे ना. म. जोशी विद्याभवनात तब्बल पन्नास वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच मूर्त स्वरूपात आणली.
ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकविले, त्यांच्याविषयीचे लेख, छायाचित्रे, आठवणी , काव्य, गुरुजनांचे आशीर्वचन इत्यादीने परिपूर्ण असलेल्या ई-पुस्तकाचे काल १ मे, २०२१ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मुहूर्तावर आभासी पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी ४० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी साहित्य पाठविले. त्यामध्ये ७८ लेख आणि ६ कविता आहेत. २२ गुरुजनांवर हे लेख आणि काव्य आहे. विशेष म्हणजे, ३ गुरुवर्यांचे आशीर्वादपर संदेश या ई-पुस्तकामध्ये आहेत. दुर्मिळ छायाचित्रे आहेत. हे पुस्तक म्हणजे कृतज्ञतापूर्ण भावनांचा सुंदर संग्रह आहे.
या इ-पुस्तकाचे संपादन डॉ. वसुधा कामत, ॲड. जयप्रकाश सावंत आणि डॉ. विवेक शेठ-धुवाड यांनी केले आहे. श्री. अभिजीत गांधी यांनी मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रकाशनासाठी श्रीमती शोभा अधिकारी आणि श्री. मोहन मोने अतिथी लाभले होते. गायिका श्रीमती अर्चना कान्हेरे यांनी ईश स्तवन सादर केले. सुमारे शंभर व्यक्ती या आभासी पद्धतीने चाललेल्या प्रकाशन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
प्रारंभ तर झाला आहे, स्नेहमय यात्रा सुरु राहावी, निसर्ग नियमानुसार यात्रिक बदलतील, करोना काळाने आखलेल्या नवीन नियमांनुसार जीवन पद्धतीमध्ये बदल घडतील, मात्र सुसंस्कार आणि आपुलकीचे दर्शन घडत रहावे, ग्रंथ प्रकाशनासारखे आणि भेटीगाठींचे विविध उपक्रम पुढे सुरु राहावेत आणि विद्याभवनाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन संपादक मंडळाने या प्रसंगी केले.