मुंबईतील गिरणी कामगारांना एकत्रितरित्या घरे देण्याचा प्रयत्न – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत बैठक
मुंबई : मुंबईतील गिरणी कामगारांना ‘नाविकास’ क्षेत्रात एकत्रितरित्या घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने म्हाडा आणि महसूल विभागाने पाहणी करून येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत आज झालेल्या बैठकीत मंत्री आव्हाड बोलत होते. त्यांनी आज म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसनाच्या काही रखडलेल्या योजनांचाही आढावा घेतला व योजना गतीने पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
रहिवाशांची पात्रता निश्चितकरण्यासाठी ‘बीडीडी सेल’ स्थापन करणार
मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचे काम रखडल्याने स्थलांतरासंदर्भातील प्रश्नावरील उपाय योजना व बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्यांच्या अनुषंगानेही मंत्री आव्हाड यांनी आज बैठक घेतली. बीडीडी चाळीतील रहिवाशांची पात्रता-अपात्रता निश्चित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून ‘बीडीडी सेल’ स्थापन केला जाईल, असे मंत्री आव्हाड यांनी सांगितले. रहिवाशांच्या पात्रतेचे निकष ठरविण्यात यावेत आणि ही प्रक्रिया सुलभ करावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले .
अंधेरी येथील जुहू – ताज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी,काळाचौकी येथील अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था, बांद्रा येथील नर्गिस दत्त नगर गृहनिर्माण संस्था आदी संस्थांच्या अडचणीसंदर्भातही मंत्री आव्हाड यांनी बैठक घेतली आणि या संस्थांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.यावेळी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यास सभापती श्रीमती शीतल उगले, ‘नवा काळ’च्या संपादक जयश्री खाडिलकर-पांडे, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे जयप्रकाश भिलारे, गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण घाग, दत्ता इस्वलकर, सेन्चुरी मिल कामगार एकता संघाचे नंदू पारकर, हेमंत गोसावी यांच्यासह गृहनिर्माण, नगरविकास, महसूल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, कामगार आयुक्त कार्यालयाचे संबंधित अधिकारीउपस्थित होते.