“गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत”- नाणारप्रश्नी खा. विनायक राऊत यांचा आरोप
राजापूर: काही दिवसांपूर्वी नाणार रिफायनरीचे समर्थन करणारी एक जाहिरात संबंधित कंपनीकडून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये मुख्य पानावर प्रसिद्ध झाली होती. यानंतर शिवसेनेवर विरोधकांकडून कडाडून टीका करण्यात येत होती. पण काल राजापूर तालुक्यातील सागवे कात्रादेवीवाडी कोचारी मैदानावर प्रकल्प विरोधी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी तीव्र विरोध दर्शवत म्हटले की, “रिफायनरी प्रकल्प तुम्हा-आम्हाला, शेतकऱ्यांना नको आहे, तर तो गुजरातच्या दोनशे वीस दलालांना हवा आहे. तुम्हाला कुणाची भांडी घासायची ती घासा, पण शिवसेनेचा भगवा हातात घेऊन कोणी प्रकल्पाचे समर्थन करणार असेल तर ते सहन करणार नाही.”
पुढे खासदार राऊत म्हणाले, यापूर्वीचे जिल्हाधिकारी प्रकल्पाचे समर्थक होते, पण त्यांना आम्ही जिल्हय़ातून बाहेर पाठवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत. ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, पण शिवसेनेची भूमिका ठाम आहे.
यावेळी उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, रिफायनरी प्रकल्पविरोधी कोकणशक्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम उपस्थित होते.