देशात मोदींइतका निर्लज्ज पंतप्रधान कधीच पाहिला नाही – राज ठाकरे
सोलापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सोलापूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली.
पुलवामाच्या शहिदांच्या स्मृतीसाठी मतं द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी नवमतदारांना करत आहेत. मी त्यांच्याइतका निर्लज्ज पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नाही. याच जवानांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले होते की सैनिकांपेक्षा जास्त धाडस व्यापाऱ्यांमध्ये असतं असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपवाले पैसे वाटतील. त्यांनी पैसे दिले तर तुम्ही घ्या, कारण त्यांनी देश लुटून खाल्ला आहे. त्यांनी देश रिकामा केला आहे, आता तुम्ही त्यांना रिकामं करा. मात्र त्यांच्याकडे पुन्हा ढुंकूनही पाहू नका असा सल्ला राज ठाकरेंनी मतदारांना दिला आहे.
महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं, तर आरक्षणाची गरजच लागणार नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार बसला आहे आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलो आहोत. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरुन मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
सरकारच्या स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी या योजनांचं पुढे काय झालं ? असा सवाल राज ठाकरेंनी सोलापुरच्या सभेत विचारला आहे. तसेच सध्या पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात या योजनांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, असं देखील राज म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना मदत होईल, अशा कोणालाही मतदान करु नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे सध्या आपल्या सभांमध्ये फक्त आणि फक्त भाजप आणि मोदी-शहा यांच्याविरुद्धच बोलताना दिसत आहेत. त्यांनी शिवसेनेविरुद्ध एकही टीका अजूनपर्यंत केलेली नाही हे विशेष.