मनसे अध्यक्ष करणार ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक
येत्या ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तेरावा वर्धापनदिन वांद्र्यतील रंगशारदा येथे होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक या दोन विषयांवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. किती दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले ते अद्याप अधिकृतरित्या सरकारने घोषित केलेलं नाहीये. कोणी ३०० तर कोणी २५० दहशतवादी मारले गेल्याचा दावा करतंय. त्याच वेळी विरोधकही विदेशी माध्यमांच्या हवाल्याने ह्या हल्ल्याच्या यशस्वितेबद्दल साशंकता व्यक्त करत आहेत. कोल्हापुरात राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते त्यावर बराच वाद झाला. ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर ते कशा प्रकारे आपले मत मांडणार आहेत ह्याबद्दलची उत्सुकता सर्व मनसैनिकांना आहेच. त्याच वेळी येत्या लोकसभा निवडणुकीत मनसे ची अधिकृत भूमिका काय असेल ह्याकडे साऱ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागून आहे.
मनसैनिक सध्या सोशल मीडियावर ९ मार्च च्या राजकीय सर्जिकल स्ट्राईक चे मेसेज व्हायरल करून वातावरण निर्मिती करत आहेत.