आचारसंहितेमुळे म्हाडाच्या घरांची सोडत निवडणुकीच्या निकालानंतर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता २३ मे नंतर ही सोडत काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलली गेली आहे.
२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा मार्ग मोकळा होईल. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने म्हाडाच्या सोडतीची तारीख एक महिन्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी पुढे गेली आहे. घरांची सोडत कधी जाहीर होईल हे 23 मे नंतरच सांगितले जाईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.
म्हाडाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २१७ घरांसाठी सोडत काढण्याचे जाहीर केले. त्यात या २१७ घरांसाठी बँकेत अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल असल्याचे नमूद केले होते. तसेच ही सोडत २१ एप्रिल रोजी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले होते.