मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात
जालना, दि. १०: जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावे यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर अपेक्षित असून सरकारने याबाबत, तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही अद्याप केलेली नसल्यामुळे आपण उपोषण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने दोन दिवसात अधिवेशन बोलावून आमच्या मागण्या मान्य कराव्यात मागणी त्यांनी केली आहे. जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने अंतरवाली येथे दाखल झाले आहेत.
Source – AIR