निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकू नये? भांडुप परिसरातील खराब रस्त्यांबाबत मनसेने दिला निर्वाणीचा इशारा
भांडुप/मुंबई: निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे सध्या अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. मुंबईतील भांडुप परिसरातही चित्र काही वेगळे नाही. या ठिकाणी तर खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाहनचालक विशेषकरून दुचाकीस्वार हैराण झाले आहेत. याच सोबत या विभागात सुमार दर्जाची गटारांची व इतर महापालिका हद्दीतील कामे चालू असल्याच्या तक्रारी टीम महाराष्ट्र वार्ताच्या “आपली समस्या” या आमच्या समस्या निवारण विभागाकडे गेल्या काही दिवसांपासून येत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निलेश सदाशिव सावंत हे नित्य नेमाने या समस्यांना वाचा फोडत असून या बाबत ते प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी देखील दाखल करत आहेत. “नवदीप कंस्ट्रक्शन” या सरकारी कंत्राटदारास या विभागातील अनेक कामे देण्यात अली असून त्याच्या दर्जाबाबत तक्रारीही अनेक येत आहेत. पण संबंधित विभागातील मुजोर अधिकारी टाळाटाळ करत असून कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे दिसते. या प्रकरणी पुढील आठवड्यात टीम महाराष्ट्र वार्ता या विभागातील महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांची(नवदीप कंस्ट्रक्शन) सदर प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भेट देणार आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर या साऱ्यांना आम्ही एकदाच मनसे दणका देऊ असा इशारा निलेश सावंत यांनी दिला आहे. मुळात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना कायमचे काळ्या यादीत टाकणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात नवी मुंबईतील २ कंत्राटदारांना महाराष्ट्र वार्ताचा असाच दणका बसला होता.
(आपली समस्या वरील समस्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आम्हाला साऱ्या तक्रारींची दखल घ्यायला थोडा उशीर होतोय, त्याबद्दल क्षमस्व!)