अवकाळी पावसामुळे आंब्याचे काय होणार? कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत
मुंबई/कोकण: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलसह रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती. गेले चार दिवस आकाशात ठाण मांडून बसलेल्या मेघराजा आज अखेर बरसला. परंतू या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. कारण येत्या ४८ तासात पुन्हा असाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
आजच्या या अवकाळी पावसामुळे तसेच गेले काही दिवस असलेल्या ढगाळ वातावरणाचा आंब्याच्या मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यात आहे असे जाणकारांचे मत आहे. डिसेंबर महिन्यात कोकण किनारपट्टी भागातील आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात होते. अशा वेळी हा मोहर गळून जाण्याच्या भीतीने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. गतवर्षी महामारीमुळे आंब्याच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला होता तर यावर्षी हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसण्याची शक्यता जास्त जाणवत असल्याचे आंबा बागायतदार वैभव सावंत म्हणाले.