“हे महाराष्ट्रातील मरकज ठरेल”- रायगड जिल्हयातील जे. एस. डब्ल्यू. स्टील प्रकरणी शिवसेना आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा गंभीर दावा
अलिबाग/रायगड: गेल्या आठवड्यात महाराष्ट्र वार्ताने डोलवी, पेण येथील जे. एस. डब्ल्यू. स्टील च्या कर्मचाऱ्यांची कंपनीपर्यंत ने-आण करणाऱ्या बस मधील सोशल डिस्टनसिंग चे वास्तव सर्वांसमोर आणले. त्याच वेळी या आठवड्यात अलिबाग, पेण तालुक्यातील स्थानिकांचा या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आक्रोश वाढलेला दिसला. ‘जे. एस. डब्ल्यू. स्टील’ मध्ये सध्या पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरातील कर्मचारी रोजच्या रोज डोलवी इथल्या प्लांट मध्ये ये-जा करत आहेत. नवी मुंबई व पनवेल परिसरात सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत हळू हळू वाढ होताना दिसतेय. आणि हीच नेमकी स्थानिकांची समस्या आहे. जर तिथून येजा करणाऱ्या कोणा बाधित कर्मचाऱ्यामुळे कोरोनाचा विषाणू आपल्या गावात आला तर काय करायचे या चिंतेने इथले ग्रामस्थ ग्रासलेले आहेत.
या प्रश्नी आम्ही अलिबाग चे शिवसेना आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याशी फोनद्वारे वार्तालाप केला. यावेळी ‘जे. एस. डब्ल्यू. स्टिल’ च्या निष्काळजीपणा बाबत संताप व्यक्त करत ते म्हणाले की, “आपण पाहतोय की सबंध देशभर दिवसेंदिवस कोविड-१९ (कोरोना)च्या रुग्णांत वाढ होतेय. महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत रोजच्या रोज मोठी वाढ होताना दिसतेय. अशा वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कोणा कंपनीचे कर्मचारी कोरोना बाधित विभागातून रोज ये-जा करत असतील तर ही बाब अलिबाग व पेण तालुक्यातील नागरिकांसाठी नक्कीच धोकादायक आहे. याबाबत आम्ही रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही गेल्याच आठवड्यात निवेदन दिले. पण अद्याप परिस्थिती जैसे थेच आहे. जर जे.एस.डब्ल्यू. स्टील ला प्लांट बंद ठेवता येत नसेल तर किमान या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही कंपनीतच राहण्या-खाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून कोरोनाच्या प्रदूर्भावाची भीती इथल्या नागरिकांना राहणार नाही”
पुढे राज्यातील काही उदाहरणं देत ते म्हणाले की, ” दोनच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी राज्यातील ५ कारागृह पूर्णपणे सील करण्याचे आदेश दिले. येथील ड्युटी वरील पोलीसांनाही आता आपल्या घरी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा ठिकाणी जर लॉकडाऊन १०० % पळाला जात असेल तर इथे का हे करता येऊ शकत नाही.” शनिवारी दि. ११ संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले यावेळी त्यांनी लोकांना सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे पुनः एकदा आवाहन केले. आज जर अलिबाग व पेण विभागाचा विचार केला तर जे. एस. डब्ल्यू. स्टील मधील कर्मचाऱ्यांची संख्या ही या विभागातील इतर कोणत्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांपेक्षा खूप जास्त आहे. अशा वेळी पुढील १८ दिवसांत जर काही अघटित घडले तर हे दिल्लीच्या धर्तीवरील रायगड किंबहुना महाराष्ट्रातील ‘मरकज’ प्रकरण ठरेल. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात ताब्लिघी जमातीने मरकज चे आयोजन केले होते. यानंतर तेथून बाहेर पडलेल्या लोकांमार्फत देशभरातील अनेक राज्यांत कोरोनाचा फैलाव झाला. जर अशीच घटना रायगड जिल्हयात घडली तर याची फळं संपूर्ण महाराष्ट्राला भोगावी लागतील. जिल्ह्यात व्हेंटिलेटरची व इतर बाबींची संख्याही मर्यादित आहे. अशावेळी जर अघटित घडलं तर याची जबाबदारी कोणी घायची याचा जे.एस.डब्ल्यू. स्टील च्या मॅनेजमेंटने व जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करावा.”
शेवटी आमदार दळवी म्हणाले की, “या प्रश्नी जर योग्य मार्ग निघत नसेल तर मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांकडे सदर विषय मांडणार आहे. अलिबाग-मुरड-पेण तालुक्यांतील नागरिकांच्या जीविताची जबाबदारी ही माझी असून त्यासाठी मी कटिबद्ध आहे.”