किसान सभेचा लाँग मार्च स्थगित, महाजनांसोबत बैठकीत तोडगा
नाशिक: अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्यावर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत किसान सभेच्या सर्व मागण्या मान्य केल्या. वर्ष होऊन सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला.
याचवेळी पालकमंत्री मंत्री गिरीश महाजन तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक मध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत शेकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघाल्याने किसान लाँग मार्च नाशिकमध्येच थांबवण्यात आला.
आदिवासी शेतकऱ्यांच्या वन हक्क तसेच जमिनीचे सर्व दावे तीन महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन महाजन यांनी दिल्यानंतर किसान सभेकडून हा मोर्चा स्थगित करण्यात आला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना अखिल भारतीय किसान सभेचं वादळ रोखण्यात यश आले आहे.