किसान सभेचा मोर्चा नाशिकहुन मुंबईच्या दिशेने रवाना
गेल्या वर्षी आश्वासन दिल्यानंतर वर्षभरात एकही आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला असून गुरुवारी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्यावर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत किसान सभेच्या सर्व मागण्या मान्य केल्या. वर्ष होऊन सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, असे किसान सभेचे म्हणणे आहे. आणि या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुन्हा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
या किसान सभेच्या मोर्चेकरांशी बातचीत करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिकमध्ये त्यांची भेट घेतली. मात्र चर्चेतून काहीच तोडगा न निघाल्यामुळे मोर्चकऱ्यांनी मुंबईकडे वाटचाल केली.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘मोदी सरकार होश मे आओ’, ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला योग्य हमी भाव द्यावा, यांसह विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.
तसेच’आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीत तर खुर्च्या खाली करा’ असे सांगत ‘लाल बावटे की जय’ अशा घोषणा देत आपला सारकारबद्दलचा तीव्र संतापही त्यांनी व्यक्त केला.
अखेर गुरुवारी सकाळी नाशिकमधून मोर्चाला सुरुवात झाली आहे. सुमारे साडे सात हजार आदिवासी शेतकरी बांधव या मोर्चात सामील झाले आहेत.