“काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दिल्लीच्या निकालावरून भाजपला टोला
नवी दिल्ली/मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल एव्हाना स्पष्ट झाले असून देशभरातून अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आप ला मिळालेल्या देदीप्यमान विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रीया
दिल्लीतील आप पक्षाच्या विजयाने अरविंद केजरीवाल यांनी जन की बात देशाला दाखवून दिली.
“दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन. दिल्लीतील जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही, बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानीक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल याना ते पराजीत करू शकले नाहीत , दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढे देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला, दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो.”
अशी प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.