साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा
कोल्हापूर : हरहुन्नरी कवयित्री कविता ननवरे यांच्या ‘सगळेच ऋतू दगाबाज’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कवयित्री, अनुवादक व स्त्रीवादी अभ्यासक माया पंडित यांच्या हस्ते पैस, राजेंद्र नगर येथे झाले. माया पंडित यांच्या राहत्या घरी दि. १८ सप्टेंबर रोजी अगदी साध्या अनौपचारिक पद्धतीने पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याला साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक किरण गुरव, प्रसिद्ध समीक्षक रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख नंदकुमार मोरे, जेष्ठ लेखक व नाटककार शरद नावरे तसेच विद्यापीठातील इंग्रजीच्या प्राध्यापक तृप्ती करेकट्टी व नाट्य कलावंत रसिया पडळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कविता ननवरे यांचा परिचय करून देताना त्यांच्या सामाजिक विषयांवरील लेखणीचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रातील विविध माध्यमं ज्यात प्रामुख्याने वृत्तपत्र, नियतकालिका, साप्ताहिकं, न्यूज पोर्टल, दिवाळी अंक आदींमध्ये त्या सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत असतात. याच काळात एबीपी न्यूज सारख्या आघाडीच्या मराठी माध्यमावर कविता यांनी लिहीलेल्या ब्लॉग्समुळे त्यांचा राज्यभर एक चाहता वर्ग निर्माण झाला. फेसबूक पोस्ट वरील त्यांच्या लेखणीची शैली नव्या-जुन्या पिढीला भुरळ घालत आली आहे. नव्या पिढीची शिलेदार असलेल्या कविता ननवरे केवळ शास्त्र म्हणून पिढी दर पिढी चालत आलेल्या अनेक चाली-रितींवर जेव्हा प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्या सध्याच्या जमान्यातील उपयुक्ततेबाबत सवाल उपस्थित करतात तेव्हा एका संवेदनशील कवित दडलेला बंडखोरपणाचा पैलू आपल्याला सर्वांना नकळतपणे जाणवतो. सध्याच्या काळात अवतीभवती चालू असलेल्या कल्लोळात ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा काव्यसंग्रह कविता ननवरे Kavita Nanaware काव्य रसिकांसाठी घेऊन आल्या आहे. मराठी वाचक त्यांच्या या नव्या काव्यसंग्रहाला भरभरून प्रेम देतील यात काही शंकाच नाही.