ऐन गणेशोत्सवात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता; नाशिक मधील ५०० हून अधिक कांदा व्यापारी बेमुदत संपावर
नाशिक, दि. २०: देशभरात कांद्याच्या दरात मोठी उसळी येऊ शकते कारण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ एपीएमसीमधील कांदा खरेदी करणाऱ्या ५०० हून अधिक व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मंडईतील कांद्याच्या लिलावात व्यापारी सहभागी होणार नाहीत आणि त्यामुळे देशातील विविध भागांतील कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कांदा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) या दोन केंद्र सरकारच्या संस्था नाशिकमधील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करत आहेत आणि वेगवेगळ्या भागातील एपीएमसीमध्ये विकत आहेत. या भावात प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपयांची तफावत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन्ही केंद्रीय एजन्सी इतर घाऊक बाजारात उत्पादनाची सरासरी १,५०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करत आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी कांद्याची घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचा सरासरी घाऊक दर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये इतका आहे.
नाफेड आणि एनसीसीएफ या दोघांनी पहिल्या टप्प्यात तीन लाख क्विंटल कांदा खरेदी केला होता आणि सध्या नाशिकमध्ये अतिरिक्त दोन लाख क्विंटल कांदा खरेदी करण्यात गुंतलेला आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले की, बुधवारपासून नाशिकच्या १५ एपीएमसीमध्ये कांद्याच्या लिलावावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.
केंद्र शासनाने निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू केली. मात्र, हा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकला जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला कमी भाव मिळतो म्हणून कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून लिलाव बंद आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी दिली.