
“जगभरात मधुमेहाशी निगडित संशोधनाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज” – केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
मुंबई, दि. १६: आगामी काळात जगभरात मधुमेहाशी निगडित संशोधनाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
“डायबेटिस इंडिया” या प्रतिष्ठित व्यावसायिक संस्थेने आयोजित केलेल्या ३ दिवसीय जागतिक मधुमेह बैठकीत उद्घाटनपर भाषण देताना डॉ. जितेंद्र सिंह जे प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ देखील आहेत, ते म्हणाले की, भारतात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आहेत आणि त्याच बरोबर आपल्या संशोधकांची कुवत, क्षमता आणि ज्ञान यांचीही काही कमतरता नाही. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय डेटा तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे कारण भारतीय रूग्णांसाठी भारतीय उपचार पद्धती, भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय विकसित करणे हे उद्दिष्ट असायला हवे. हे देखील महत्त्वाचे आहे कारण भारतीयांची वैशिष्ट्ये पाश्चिमात्य लोकांपेक्षा भिन्न आहेत आणि अनुवांशिक प्राबल्य देखील भिन्न आहे असे ते म्हणाले. परिणामी, टाइप 2 डायबेटीस मेलिटस आणि इतर संबंधित चयापचय विकारांची वाढ पाश्चात्य लोकांप्रमाणे नाही असेही त्यांनी नमूद केले.
संशोधनाच्या पुराव्यांचा दाखला देत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आता हे सिद्ध झाले आहे की युरोपियन देशांमध्ये अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये, जरी तो भारतात राहत नसला तरीही टाईप 2 मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त आहे आणि ते ज्या वातावरणात राहतात ते देखील वेगळे आहे. भारतीयांमध्ये प्रचलित असलेल्या काही महत्त्वाच्या जोखीम घटकांचा संदर्भ देत, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की आपल्याकडचा लठ्ठपणा देखील इतरांपेक्षा वेगळा आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की मधुमेह रोखणे हे आरोग्यसेवेप्रति केवळ आपले कर्तव्य नाही तर राष्ट्र उभारणीप्रति देखील आपले कर्तव्य आहे, कारण आपल्या देशात ७० टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालील आहे आणि आजचे तरुण हे भारताचे @2047 प्रमुख नागरिक बनणार आहेत. टाइप 2 मधुमेह आणि इतर संबंधित विकारांमुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतींमध्ये त्यांची ऊर्जा वाया जाऊ देणे आपल्याला परवडणारे नाही.