जैव विविधतेने नटलेल्या परंतू सध्या धोक्यात असलेल्या पश्चिम घाटाबाबत ‘आयआयटी मुंबई’ने दिली धक्कादायक माहिती !
रत्नागिरी, दि. १७: पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९० साली प्रति हेक्टर ३२ टनांहून अधिक माती वाहून गेली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ६२ टन ७०० क्विंटलवर पोहोचल्याचं प्राध्यापक पेन्नन चिन्नसामी आणि वैशाली होनप यांनी केलेल्या अभ्यासात आढळलं. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक १२१ टक्क्यांनी, गुजरातमध्ये ११९ टक्क्यांनी, महाराष्ट्रात ९७ टक्क्यांनी, केरळमध्ये ९० टक्क्यांनी आणि गोव्यात ८० टक्क्यांनी जमिनीची धूप वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे. जमिनीची धूप वाढल्यानं कृषी उत्पादनात घट, पाण्याच्या गुणवत्तेत घट, गोड पाण्याच्या स्रोतांवर दुष्परिणाम होतात. हवामान बदल आणि जमिनीचा गैरवापर यामुळं जमिनीची धूप वाढल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं आहे. हे रोखण्यासाठी पश्चिम घाटातला मानवी हस्तक्षेप कमी करणं, संवर्धनाचे प्रयत्न वाढवण्यासाठी ठोस धोरणांच्या तात्काळ अंमलबजावणीची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून ही माहिती गोळा करण्यात आली होती. मातीचा दीर्घकालीन ऱ्हास तपासणारा हा पहिलाच अभ्यास असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.
Source – AIR