बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा रेकॉर्ड ब्रेक ९५.८९ टक्के निकाल
पुणे: थोड्याच वेळापूर्वी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी ९०.६६ टक्के इतका उचांकी निकाल लागला असून गतवर्षीपेक्षा यावर्षी यात वाढ झाली आहे. कोकण विभागाने ९५.८९ टक्के मिळवत विभागनिहाय निकालात बाजी मारली आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागच अव्वल ठरला होता.
राज्याचा विभागनिहाय निकाल पहा :
- कोकण – ९५.८९ टक्के
- पुणे – ९२.५० टक्के
- कोल्हापूर – ९२.४२ टक्के
- अमरावती – ९२.०९ टक्के
- नागपूर – ९१.७५ टक्के
- लातूर – ८९.७९ टक्के
- मुंबई – ८९.३५ टक्के
- नाशिक – ८८.८७ टक्के
- औरंगाबाद – ८८.१८ टक्के
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा
आज बारावीचे निकाल घोषित झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “आज बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन! एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही. सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!” याच सोबत या परीक्षेत अयशस्वी झालेल्या मुलांनाही ते म्हणाले की, “ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, त्यांनी खचून जायची गरज नाही. आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असे नाही आणि एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही. तुम्ही उद्याच्या समृध्द महाराष्ट्राचा कणा आहात. तुम्हाला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!”