तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे म्हणतात आम्हाला समिती मान्य नाही
मुंबई: महाराष्ट्र होमगार्डस प्रशासनाच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभाराची शृंखला काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. या परिस्थितीला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या होमगार्ड महाराष्ट्र चे महासमादेशक संजय पांडे यांच्या बेजबाबदार कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही काळापासून महाराष्ट्र वार्ता याबाबत सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधत आहे.
पुणे येथील ‘बसव प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी महासमादेशक पांडे यांच्या विरोधात थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे दि. १७ जुलै रोजी व केंद्रीय गृहमंत्रालयात दि. ९ जुलै रोजी अधिकृतरित्या तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारींमध्ये त्यांनी होमगार्ड्स ला शासनाकडून नियमितपणे निधी येऊनही वेळेत मानधन न मिळणे, कोणत्याही वैध कारणाशिवाय होमगार्ड्स ना सेवा समाप्ती देणे, होमगार्ड्स च्या हिताचे निर्णय न घेणे या व अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या. राष्ट्रपती कार्यालयातून या तक्रारींची दखल तात्काळ घेतली गेली व महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे पुढील कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आले होते तसेच केंद्रीय गृहविभागानेही होमगार्ड केंद्रीय महासंचालकांकडे सदर तक्रारीवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यावर त्यांनी राज्याच्या होमगार्ड विभागाला समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्री सदस्सीय समिती नेमण्याचे निर्देश दिले होते व अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी राज्याचे होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांनी त्री सदसिय समितीसाठी सदानंद वायसे पाटील, पोलीस अधीक्षक तथा वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी (प्र.व.धो.) यांची समिती अध्यक्ष पदी तर राहुल श्रीरामे, अधीक्षक नागरी संरक्षण तथा वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी (चा.व.भा.) यांची समिती सदस्य व वामन ते धकाते, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांची समिती सचिव पदी नेमणूक करण्यात आले असल्याचे आदेश पत्र दि.०३ सप्टेंबर रोजी काढण्यात आले. मुळात ज्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली गेली त्याच अधिकाऱ्याचा वरचष्मा समितीवर असणे ही बाब धक्कादायक असून सदरील नेमलेली समिती आम्हाला मान्य नसल्याचे रामलिंग पुराणे यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की, “मा. राष्ट्रपतीजींना व केंद्रीय गृह विभागास ज्यावेळी आम्ही तक्रारी मांडल्या आहेत त्यात राज्याच्या होमगार्ड महासमादेशकांवरही तक्रार नमूद असून त्यांनीच ही समिती नेमली आहे आणि त्यात त्यांच्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या त्यांच्याच मर्जीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यामुळे राज्यातील होमगार्ड समस्या सुटणार नाहीत आणि अहवालही योग्य जाणार नाही त्यामुळे महासमादेशक यांनी नेमलेली समिती आम्हाला मान्य नाही, कृपया आपण आमच्या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची चौकशी जर करायची असेल तर यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी करावी व महाराष्ट्र राज्यातील होमगार्डच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यावे ही विनंती.” दि. ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशक यांनी समिती नेमलेली आदेश तात्काळ रद्द करून नव्याने समिती नेमावी असे पत्र बसव प्रतिष्ठान अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना व राष्ट्रपती, केंद्रीय गृह विभाग, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री तसेच महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दि. ३ रोजी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून याकाळात तरी महाराष्ट्र होमगार्ड्सचे थकीत भत्त्यांपासून अनेक प्रश्न निकाली लागणे गरजेचे आहे.