विशेष सूचना : सोमवारपासून मुंबईकरांचा डबा ६ दिवस बंद
मुंबई: मुंबईकरांना आपल्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात अगदी वेळेवर डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले येत्या १५ एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे डब्बे घेणाऱ्या मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.
मुंबईचे डबेवाले मोठ्या प्रमाणात जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, अकोला, खेड, मुळशी, मावळ या भागतील आहेत. सध्या या जिल्ह्यांमध्ये यात्रेचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे यात्रेसाठी मुंबईतील डबेवाले गावी जातात. त्यामुळे डबेवाल्यांनी सोमवार १५ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत मुंबईत जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा बंद ठेवली आहे.
या सहा दिवसाच्या सुट्टीत महावीर जयंती व गुडफ्रायडे या दोन सरकारी सुट्या आहेत. डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे त्याबद्दल डबेवाले असोसिएशनकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांनी डबेवाल्यांच्या सुट्टीचा पगार कापू नये अशी मागणीही मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. २२ एप्रिलपासून पुन्हा डबेवाला आपल्या ठराविक वेळेत कामावर हजर होणार आहेत.