इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती जारी केले नसल्याचे शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण
मुंबई/पुणे, दि.२२: राज्यात २०२१-२२ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रिये बाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आली नाही, असं शिक्षण संचालकांनी स्पष्ट केलं आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत सविस्तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येतील, असं शिक्षण संचालक द गो जगताप यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल अशा सूचना दिल्या जाऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. काही उच्च माध्यामिक विद्यालयांनी २०२१-२२ साठी इयत्ता अकरावीचा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं केली जात असल्याचं निदर्शनात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागानं हे निर्देश जारी केले आहेत.