१० ते १५ जानेवारीपर्यंत किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी हळूहळू घट होणार
मुंबई, दि. १०: महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यात अनेक भागात धुक्याची दुलई पसरली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात थंडीची लाट सुरू आहे. मुंबईतील किमान तापमानात घट झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील किमान तापमानात हळूहळू घट होऊन थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकणातील किमान तापमान सरासरीइतकेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात, उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्याला लागून असलेला काही भाग, तसेच विदर्भाच्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. किमान तापमान ८ ते १२ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. विदर्भ आणि खान्देशातील बहुतांश भागात किमान तापमानात ४ ते ६ अंशांची घसरण झाली आहे. त्यामुळे विदर्भातील नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगावसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पारा घसरला असून, त्यामुळे थंडी आणखीनच वाढली आहे. १० जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी हळूहळू घट होईल. मुंबईसह कोकण भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील आणि काही प्रमाणात थंडी जाणवेल.