गोरगरिबांना चिंतामुक्त करतांनाच नवा महाराष्ट्र घडविण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
नागपूर: ‘संताचा तो प्रचार अमर.. अजुनही लोकमनावर.. राज्य चालोनी निरंतर.. लाखो जीवा उद्धरीतो’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ओळींनी समारोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला चिंतामुक्त करतांनाच नवा महाराष्ट्र घडविण्याची ग्वाही दिली. विकास कामांना स्थगिती दिली नसून ज्या ठिकाणी स्थगीती दिली आहे, त्यातील त्रुटी दूर करून काम सुरू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत काल झालेल्या चर्चेला उत्तरे देतांना मुख्यमंत्री बोलत होते. सदस्य सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा अभिनंदनपर ठराव मांडला होता.
राज्यपालांनी मराठीत अभिभाषण केले त्यांना धन्यवाद देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हे अभिभाषण म्हणजे शासनाच्या प्रगतीची गीता आहे. कमी बोलून जास्त काम करायचं या युक्तीप्रमाणे सरकारच्या कामाची दिशा असेल, असे सांगतानाच राज्याच्या सर्वच क्षेत्राच्या प्रगतीची गाथा या गीतेत आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संत गाडगेबाबांचा उद्या स्मृती दिन असल्याचा उल्लेख करून गाडगेबाबांनी साध्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, वस्त्र देणे, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देणे अशा पद्धतीचे काम सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशातील वैभव शाली आणि संपन्न राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकीक आहे. त्या महाराष्ट्रावरील कर्जाचा गोवर्धन पेलण्याकरीता सगळ्यांनीच एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करतांनाच हे सरकार राज्यातील जनतेला चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नवा महाराष्ट्र घडवतांनाच आपले राज्य अधिक महान होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. राज्यपालांचे भाषण राज्याच्या प्रगतीची मार्गदर्शिका असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
हे सरकार गोरगरिबांचे असून राज्यात सुरू असलेल्या विकास कामांना स्थगीती दिलेली नाही. ज्या कामांच्या स्थगीतीच्या सूचना आहेत त्यातील त्रुटी दूर करून ते काम सुरू ठेवण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओळींचा दाखला देत…. लाखो जीवा उद्धरती या प्रमाणे सरकारचे काम असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या समारोपात दिली.