भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि.२४: राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते. या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातलं मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट असून, शरद पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला, असं फडणवीस म्हणाले. बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शंभरहून अधिक मुद्दे राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं, ते म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती, भाजपा नेते मुनगंटीवार यांनी दिली.