ऍड. प्रशांत भूषण यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाई प्रकरणी ऍड. जयप्रकाश सावंत यांच मनोगत
न्यायालयाचा मान आणि अवमान
दिल्लीमधील एका ज्येष्ठ वकिलाची कृती न्यायालयाचा अवमान करणारी होती अथवा नव्हती यावर अनेकजण मते व्यक्त करीत आहेत. तसा त्यांना अधिकारही आहे. ज्येष्ठता पावलेल्या अनेक वकिलांचे वर्तन पाहता ते सर्वच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आणि न्यायालयाचे अधिकारी म्हणविण्यास पात्र आहेत असे म्हणता येणार नाही. कायद्यामधील तरतूदींचा आपल्या पक्षकाराला उपकारक असा अर्थ काढण्यामध्ये, त्यासाठी शब्दांना कलाटणी देण्यासाठी यांचे होणारे खटाटोप पाहता लाज वाटते. प्रचंड फी, अमाप लोकप्रियता आणि सुरक्षित जागेमधील वावर यामुळे यांच्या सामाजिक जाणीवा केव्हाच बोथट झालेल्या असतात. त्यांचे खाजगी आणि सार्वजनिक जीवनही वादग्रस्त असते.
अनेक ज्येष्ठ वकील तर परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या बिनसरकारी संस्थांशी निगडित असतात. जर खरोखरच न्यायालये भ्रष्ट असतील (आणि आहेतही?), तर आपल्या हुशारीचा पूर्णपणे वापर करून हि भ्रष्ट व्यवस्था नष्ट करण्यासाठी किती ज्येष्ठ वकील पुढे सरसावले आहेत? सगळेच आपल्या हस्तिदंती मनो-यातुन टीका टिप्पणी करीत असतात. केलेल्या कृतीबद्दल यांना ‘खेद’ वाटतो, परंतु त्याबद्दल ‘माफी ‘ मागावीशी वाटत नाही. अशांना ‘येन केन प्रकारेण’ प्रसिद्धी मिळत असते. बेलगाम आणि आधारहीन वक्तव्यांना आळा बसलाच पाहिजे. ‘आता नको नंतर’ असे म्हणणारे कुठल्या बाजूचे आहेत हे समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एकांगी नाही. तो प्रतिष्ठा जपणारा आहे. न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा किती करावी हे महत्वाचे नाही. त्यांची सनद शाबूत राहणार आणि ‘नायक’ म्हणून त्यांची माध्यमांमध्ये काही काळ चर्चाहि रंगणार . न्यायासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या सामान्य नागरिकाला प्राप्त परिस्थितीत दिलासा कसा मिळणार याचीच चिंता सर्व सामान्य वकिलांना आहे. उद्वेगापोटी त्यांच्याकडून अभद्र भाषा, तीही जाहीरपणे, वापरली जात नाही. हाच तर ‘ज्येष्ठता’ आणि ‘सभ्यता’ यातील फरक आहे.
– ऍड. जयप्रकाश सावंत
(ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय)