‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही’
बारामती: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची ओळख आहे. याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्लावर भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदार संघ भाजप जिंकणार आणि बारामतीत कमळ फुलणार असे विधान केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शहा यांच्या विधानानंतर बारामती शहरात आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म कधी होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही’, अशा आशयाचे पोस्टर्स बारामती शहरातील प्रशासकीय भवन, नगरपालिका, पंचायत समिती आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. पोस्टर्सच्या खाली समस्त बारामतीकर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आत्तापासून सुरु झालेला दिसत आहे.
शनिवारी भाजपची पुण्यात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप राज्यात 43 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. 43 वी जागा ही बारामतीची असेल, असे भाकित मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्तवले होते. तर, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यातील एक जागा बारामतीचीही हवी असं भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले होते.